महाराष्ट्र बालहक्क आयोगाचे आदेश : बालविवाह रोखण्यासाठी मोठा निर्णय
राज्यात बालविवाहाच्या प्रथेला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने (एमएससीपीसीआर) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता राज्यातील कोणत्याही लम्माच्या निमंत्रण पत्रिकेवर वधू आणि वर या दोघांच्याही जन्मतारखा प्रसिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिल्याने त्या कमी वयात माता होत असल्याच्या वाढत्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
अल्पवयीन मातांच्या प्रकरणांची चौकशी
आयोगाने केवळ नियमच बनवले नाहीत, तर ज्या अल्पवयीन मुली माता झाल्या आहेत अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यासाठी आरोग्य, पोलिस, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक अशा प्रकरणांचा तपास करून जबाबदारी निश्चित करेल.
केवळ कायदे करून बालविवाह थांबत नसल्याने आता सामाजिक स्तरावर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
वय पडताळणी सोपी होणार
सामान्य नागरिकही संबंधित मुला-मुलीचे वय कायदेशीर आहे की नाही, याची खातरजमा करू शकतील. राजस्थानसह इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या नियमामुळे बालविवाह रोखण्यात यश आले असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा नियम लागू करण्यात आला आहे.
ITN रिपोर्टींग कृष्णा इंगोले